“आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा, राज्यात लवकरच सरकार स्थापन होणार”
मुंबई | “राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली. सरकार स्थापनेसंदर्भात त्यांनी काही निर्णय घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. बैठकीनंतर आघाडीच्या काही नेत्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे आणि लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल,” अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
“काल काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये काय चर्चा झाली याबाबत मी वक्तव्य करणं योग्य नाही. परंतु या बैठकीत सरकार स्थापनेसंदर्भात काही निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. किमान समान कार्यक्रमावर कालची बैठक आधारीत होती. ही बैठक सकारात्मक झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये यावर अंतिम निर्णय होईल,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच “राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. यापुढील सर्व निर्णय हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जाणार आहेत,” असंही ते म्हणाले.