राणे म्हणतात, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा!
मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. त्यातच ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अथवा देऊ नये हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे पण या प्रकरणात झालेल्या आरोपाने महाराष्ट्राची बदनामी झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपा नेते नारायण राणे यांनी केली आहे.
वाचा :-परमबीर सिंग यांचा आरोप खोटा; अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार – अनिल देशमुख
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ‘राज्यात पैसे द्या आणि मुडदे पाडा असा कारभार सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे’, असा घणाघात करत, ‘वाझेंची चौकशी होत आहे. आता गृहमंत्र्यांचीही होईल. राज्याला मुख्यमंत्र्यांनी काळीमा फासला आहे. असा बेजबाबदार मुख्यमंत्री पूर्वी झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एक क्षणही खुर्चीवर राहू नये’, अशी टीका नारायण राणेंनी केली. ‘परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांबाबत मुख्यमंत्र्यांना आधी कळवलं होतं. मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही?’, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
त्याचबरोबर ‘सचिन वाझेंना पोलीस खात्यात आम्ही आणलं नाही, असं अनिल देशमुख आणि परमबीर सिंगही म्हणत आहेत. म्हणजेच वाझेंना पोलीस खात्यात मुख्यमंत्र्यांनी आणल्याचं स्पष्ट होत आहे. सिंग यांचा रोख थेट मुख्यमंत्र्यांच्या दिशेने आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांसाठीच काम करत होते. तेच त्यांचे वाझेंचे गॉडफादर आहेत. हिरेन यांना मारण्याचं पाप वाझेंनीच केलं आहे. वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते. त्यामुळे वाझे हे मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शक होते का?’, असा सवाल करतानाच ‘या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या अथवा नका घेऊ पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा’, अशी मागणी राणे यांनी केली आहे. तसेच ‘सचिन वाझे कुठे राहत होते हे मुख्यमंत्र्यांना माहित आहे. वाझे वर्षा निवासस्थानी आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये राहत होते. वर्षावर राहून वाझे सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना देत होते’, असा घणाघाती आरोपही राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला. त्याचबरोबर ‘वाझे काय करत होते. त्यांचे काय उद्योग होते, हे सर्व मुख्यमंत्र्यांना माहीत होतं’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.