विद्यार्थ्यांमधील वैचारिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन आवश्यक
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद : वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गुजरात, सुरत येथे वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारोहाला संबोधित केले.
याप्रसंगी राष्ट्रपती म्हणाले की, प्रख्यात गुजराती साहित्यिक नर्मद शंकर दवे किंवा वीर नर्मद यांच्या नावावर या विद्यापीठाचे नाव वीर नर्मद दक्षिण गुजराती विद्यापीठ करण्यात आले आहे. दवे हे केवळ कवी किंवा लेखक नव्हते तर ते समाजसुधारक देखील होते. वीर नर्मद हे राष्ट्र निर्माते होते ज्यांनी गुजराती आणि भारतीयांना एक ओळख प्राप्त करून दिली तसेच त्यांनी महिला सक्षमीकरण, विधवा पुनर्विवाह आणि इतर अनेक कार्य केली.
दक्षिण गुजरात हे या राज्याचे आर्थिक सुकाणू आहे आणि या प्रदेशात सुरत लक्षणीय योगदान देत आहे असे राष्ट्रपती म्हणाले. सुरतमधील वस्त्रोद्योग आणि हिरा उद्योग विशेष आहे आणि देशभरातील कामगार येथे रोजगारासाठी येतात आणि म्हणूनच सुरत शहराला “मिनी इंडिया’ म्हणून देखील संबोधले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमता वृद्धींगत करण्यासोबतच त्यांच्यामधील नवोन्मेष आणि वैचारिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे असे राष्ट्रपतींनी सांगितले. शिक्षण आपल्याला दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करायला तसेच समाजाच्या कल्याणासाठी झटायला देखील शिकवते.