आता 24 तासांत कर्जमाफी जाहीर झाली नाही तर आंदोलन छेडु – येडियुरप्पा
कुमारस्वामी सरकारला येडियुरप्पा यांचा इशारा
बंगळुरू – कर्नाटकातील कॉंग्रेस- जेडीएस आघाडीच्या सरकारने सत्ता मिळाल्यावर 24 तासांत कर्जमाफी जाहीर करू असे आश्वासन दिले होते. आता जर त्यांनी हे आश्वासन पाळले नाही तर त्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी दिला आहे. आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
ते म्हणाले की या पक्षांनी शेतकऱ्यांचे 53 हजार कोटी रूपयांचे कर्जमाफ करण्याचे जाहीर आश्वासन दिले आहे आता त्यांनी ते पाळलेच पाहिजे. कुमारस्वामी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला तसेच भ्रष्ट कारभाराचा आम्ही तत्परतेने विरोध करून राज्यातील जनतेच्या हिताचे रक्षण करू. राज्यात झालेली ही संधीसाधू आघाडी आहे आणि ते लोक केवळ मिळेल तसा भ्रष्टाचारच करणार आहेत हे उघड आहे. पण आम्ही त्यांच्यावर दबाव ठेऊ असे ते म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे उभारण्याची मोठी गरज आहे. आम्ही या सरकारला त्याकडे लक्ष देणे भाग पाडू असे ते म्हणाले.
या सरकारने पाटबंधारे उभारणीसाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याच्याही आधी त्यांनी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बॅंकांकडून घेतलेले 53 हजार कोटींचे कर्ज माफ केले पहिजे असे ते म्हणाले.