‘लिहून ठेवा, 4 एप्रिल 2021’; ठाकरे सरकार पडणार-भाजप प्रवक्ते अवधूत वाघ
मुंबई – अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर नवनव्या खुलासे व आरोपांमुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत चालले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच हप्ते वसुलीचा आरोप केल्याने ठाकरे सरकार घेरलं गेलं आहे. अनिल देशमुख यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले असले तरीही महाविकास आघाडी या सर्वाला कसे उत्तर देते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा :-‘काँग्रेसचा चप्पल उचल्या सचिन सावंत’, निलेश राणेंची बोचरी टीका
कोरोनाचे वाढते संकट, तसेच 20 दिवस आधीच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे अडचणीत सापडलेले ठाकरे सरकार मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने अधिकच खोलात गेले आहे. यातच आता भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
लिहून ठेवा
४ एप्रिल २०२१#Countdown— Avadhut Wagh अवधूत वाघ (@Avadhutwaghbjp) March 20, 2021
परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अवधूत वाघ यांनी एकामागोमाग एक अनेक ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यातच त्यांनी ‘लिहून ठेवा, ४ एप्रिल २०२१’, असे ट्विट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अवधूत वाघ यांच्या ट्विटमुळे येत्या 4 एप्रिलला ठाकरे सरकार पडणार की सचिन वाझे प्रकरणात आणखी नवा मोठा खुलासा होणार ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, भाजप नेत्यांकडून सातत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता अवधूत वाघ यांच्या ट्विटचा अर्थ नक्की काय, हे येणाऱ्या दिवसातच कळेल.