चिंताजनक! हिंगोलीतील अनेक गावांमध्ये भूगर्भातून गूढ आवाज
हिंगोली |
औंढा नागनाथ, कळमनुरी, वसमत तालुक्यातील काही गावांमधून बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज येऊ लागला आहे. या तिन्ही तालुक्यांतील काही गावांमध्ये मागील दोन ते तीन वर्षांपासून सतत होणारे हे आवाज गावकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनले आहेत. भूगर्भातील आवाजांमध्ये ग्रामस्थांमध्ये एकप्रकारची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या आवाजाबाबतची पाहणी करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना कळवल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
औंढा तालुक्यातील पिंपळदरी राजदरी, सोनवाडी, जांभरून, कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव,नांदापूर, बोल्डा,वसमत तालुक्यातील वापटी,पांगरा शिंदे आदीसह परिसरातील काही गावांमधून भूगर्भामधून बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. अवघ्या काही सेकंदात मोठा आवाज होऊन गडगडाट झाला. मात्र याबाबत भूकंपाची नोंद झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांना भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये याबाबत जनजागृतीही केली आहे. तसेच प्रशासनाचे अधिकारी वेळोवेळी या गावांना भेटी देऊन पाहणीही करीत आहेत. नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या पथकाने या परिसरात येऊन पाहणी केली होती. भूगर्भात असलेल्या पोकळीमध्ये पाणी शिरल्यानंतर मोठा आवाज होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- आवाजाबाबत योग्य परीक्षण व्हावे- ग्रामस्थ
औंढय़ासह नजीकच्या तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून सतत होणारे आवाज गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने आता वरिष्ठ पातळीवरील शास्त्रांकडून या परिसरात सर्वेक्षण करावे व नेमका आवाज कशामुळे येत आहे, याची माहिती गावकऱ्यांना द्यावी. त्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळेल.
– बापूराव घोंगडे, ग्रामस्थ, पिंपळदरी.