#waragainstcorona: दिल्लीश्वरांनी द्वेश केला तोही याद राखतो महाराष्ट्र माझा : अमोल मिटकरी
– भाजपकडून द्वेश वसुडाच्या राजकारणाचा घेतला समाचार
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
गेल्या 6 महिन्यापूर्वी सत्ता बदल झाला आणि पाहता पाहता भाजपाने असुयेच्या चुडी हातात घेऊन महाराष्ट्राच्या महत्वाकांक्षेच्या टोलेजंग प्रसादास चोहीकडून आग लावण्याचा उपक्रम सुरु केला नव्हे तो राजरोस सुरूच ठेवला . “राष्ट्राये स्वाहा ” ऐवजी ” “देवेन्द्र राष्ट्राये महा :” म्हणुन महाराष्ट्र देश संकटातून मुक्त करण्याचे सोडुन मनातील महाराष्ट्र ‘द्वेष’ पावलोपावली दाखवुन दिला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली आहे.
मिटकरी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे की,
पराभव जिव्हारी लागल्यामुळे खुद्द दिल्लीच्या नरेंद्र मोदीजी आणि अमितजी शहा यांनी देखील हिच महाराष्ट्र द्वेषाची आसूया कायम मनात ठेवली . महाराष्ट्र राज्याचे 16 हजार करोड रु थकबाकी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली. एकट्या महाराष्ट्राचा GST चा वाटा 1करोड 85 लाख 917 कोटी इतका भक्कम असतानाही दिल्लीश्वरांनी 2824.57 कोटी ही तुटपुंजी मदत पाठवली.
त्या तुलनेत उत्तर प्रदेश सरकार GST चा वाटा 6528 कोटी रु. मात्र योगि आदित्य नाथांना 8255.19 कोटी इतकी भक्कम मदत केंद्र सरकारने पाठवली.
ह्या महाराष्ट्र देशाचा फक्त द्वेष सुरु ठेवला. का? तर फक्त सत्ता नाही म्हणुन??
मोदीजी व अमित जी आपणास चांगले ठाऊक आहे की देशाची आर्थिक राजधानी मुंबई जी अक्ख्या देशाला पोसते तिच सध्या भीषण संकटात आहे. मात्र तरीही महाराष्ट्र राज्यात सध्या या घडीला अर्धा उत्तर प्रदेश, बिहार आनंदाने दोन्ही वेळ सुखाने खातो व जगतो आहे हेच महाराष्ट्रराज्याचं वेगळेपण !.
आज एकीकडे या भीषण आर्थिक संकट असतानाही “महाराष्ट्र’ अविरत एकहाती झुंजतो आहे तर दुसरीकडे भाजपा च्या राज्यातील नेत्यांना याची जाण असुन सुद्धा महाराष्ट्रात राहुन, महाराष्ट्राचेच खाऊन जाणीवपूर्वक आर्थिक अडचण निर्माण तर केलीच शिवाय खोडसाळपणे ” PM CARE फंड” आर्थिक मदत करण्याचे आव्हान करून महाराष्ट्र द्वेष जाहीर दाखवून दिला ही शोकांतिका म्हणावी लागेल.
एकेकाळी उठसूट महाराष्ट्र देशाच्या प्रगतीच्या आणाभाका घेणारे भाजपा वाले देशभक्त इतका “महाराष्ट्र द्वेष ‘ करतील हे कुणालाच वाटलं नव्हतं.
दिल्ली कडे बघा उत्तर प्रदेश व गुजरात वर प्रेम असणाऱ्या मोदीजी, अमित शहा जी कडुन काही तरी शिका. त्यांच्या राज्यावर किती जिव ओतुन लक्ष ठेवायला तत्पर असतात मात्र हा गुण देखील तुमच्या कडे नसावा?
एक नेहमी लक्षात असु द्या हा ‘दिल्लीलाही घाम फोडणारा “शिवरायांचा महाराष्ट्र” आहे.सह्याद्रीच्या रांगा आजही याच्या साक्षी आहेत . महाराष्ट्रातील हे चांगलेच ठाऊक आहे.
प्रबोधनकार ठाकरे या बाबत एक छान दाखला देताना लिहितात, “इतिहास साक्षी आहे, पारीस च्या सरहद्दीवर जेंव्हा जर्मनांच्या डुकरमुसंडीला तोंड देण्याचा प्रसंग येऊन बेतला तेंव्हा शिख व गुरखे कसे भेदरले, बिकानेरच्या महाराजांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला व महाराष्ट्राला” तुम्ही काळिमा फासणार काय? असा जाठ, रजपूत, मराठ्यांना सवाल टाकताच, मेजर डफळ्यानी सरकन म्यानातुन तलवारी काढुन उंच भारतातच जाठ, रजपुत मराठ्यांनी “बोलो शिवाजी महाराज कि जय” अशी गगनभेदी गर्जना कशी केली आणि अवघ्या सहा तासात पाण्याचा एक घोटही न पिता ताबडतोब जर्मनी च्या मोर्च्यावर लांडगे तोडीचा हल्ला चढवुन अवघ्या 6 तासात जर्मन गब्रूना पारिस पासुन 47 मैलांवर रेटीत नेऊन कसे उध्वस्त केले याच्या परिचयाची बिकानेर चे रणगाजी महाराज साक्षी आहेत.”
हा जर महाराष्ट्राचा इतिहास असेल तर महाराष्ट्रावर ओढवलेल्या या संकटालासुद्धा माझा “महाराष्ट्र”एका दिलाने, एकजूटिने व तितक्यात ताकदीने साता समुद्रा पलीकडे हद्दपार करेल यात कुणालाच शंका नाही.
विरोधी पक्ष आतातरी द्वेष व सुडाचं राजकारण बाजुला ठेवुन यावर गांभीर्याने विचार करेल अशी माफक अपेक्षा ! अजूनही वेळ गेलेली नाही. हे औदार्य व “महाराष्ट्र” राज्याची एकजूट अवघ्या जगाला दाखवुन देण्याची हिच ती वेळ. परत संधी नाही.
(जय जिजाऊ !! जय शिवराय !!जय भिम !!जय महाराष्ट्र !!)
शेवटी एकच सांगेल
“दिल्लीचे ही तख्त राखितो l महाराष्ट्र माझा l
द्वेष केला तेही याद राखितो l महाराष्ट्र माझा ll