‘आमदार संपर्कात, निवडणुकांच्या आधी अनेकांची घरवापसी होईल’; शरद पवार गटातील नेत्याचा दावा
मुंबई | निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं आहे. यावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावरून शरद पवार गटाचे नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला आहे. काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल, असं ते म्हणाले.
अनिल देशमुख म्हणाले की, फडणवीसांना माहिती आहे की हे सगळं का झालं, कसं झालं, कुठून झालं आणि कोणी केलं. काही अदृष्य शक्तींचा वापर करून हे सगळं केलं गेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. उगाच काहीतरी सांगायचं, लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची यासाठी ते काहीही वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्रातीला जतनेला सगळं काही माहिती आहे. शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं, काल राष्ट्रवादीच्या बाबतीत जे झालं त्याची जनतेला कल्पना आहे. महाराष्ट्रातील जनता हे सगळं घडवणाऱ्यांना योग्य वेळी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.
हेही वाचा – ‘पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा हीच मोदींची गॅरेंटी’; संजय राऊतांची टीका
आमच्या पक्षात कुठेही अस्थिरता नाही. उलट भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये सर्वाधिक अस्थिरता आहे. कारण ते मूळचे भाजपाचे लोक आहेत. भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु, त्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत. बाहेरचे लोक आले आणि सर्वात आधी पंगतीला बसले. त्यामुळे भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे. यासह वेगवेगळी अमिषं दाखवून ज्या आमदारांना त्यांनी (अजित पवार) तिकडे नेलं आहे, त्यापैकी बहुतेकजण नाराज आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले.
मतदारसंघात विकासकामं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी हवा असतो. पैसे हवे असतात. त्यामुळे अनेक आमदार महायुतीत सहभागी झाले आहेत. परंतु, निवडणुका जवळ आल्यावर त्यातल्या बहुसंख्य आमदारांची एकेक करून घरवापसी सुरू होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर हे आमदार शरद पवार यांच्याकडे परत येतील. अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांच्या आधी फुटलेले आमदार परत येतील, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.