#War Against Corona: मावळातील ‘लाखांचा पोशिंदा’आमदार सुनील शेळके; नागरिकांनी दिल्या ‘दुवा’ (व्हीडिओ)
– आमदार सुनील शेळके यांचा उपक्रम महाराष्ट्रासाठी नवा आदर्श
– ‘मदत नव्हे कर्तव्य’उपक्रमांतर्गत घरपोच मोफत अन्नधान्य वाटप
– तालुक्यातील २० हजार कुटुंबाना किमान महिनाभर पुरेल इतका किराणा
मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरानाच्या रोगामुळे रोजगार गेला…घरात असलेलं रेशनही संपलं…हाताला काम नाही…खिशात पैसा नाही…घराबाहेर पडता येईना…आता करायचं काय? एक-एक दिवस काटकसर करुन काढताना बंद (लॉकडाउन) संपल्यावर काम मिळेल, अशी आशा होती. पण, सरकारनं बंद वाढवला…कुटुंबावर संकट ओढवले… मात्र, आण्णानं एक-दोन दिवस नाही, तर महिनाभर पुरेल इतका किराणा घराकडं पाठवून दिला. भूकेलेल्यांच्या पोटाला मायेचा घास देणारा आण्णा ‘लाखांचा पोशिंदा’ठरलाय… अशा भावना मावळातील आदिवासी पाड्यावरील महिला-बांधवांनी व्यक्त केल्या.
मावळ तालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र परिवार यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे सोमवारी सकाळी ११ वाजता धान्यवाटप उपक्रमांची औपचारिक सुरूवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात १४ हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात येणार आहे.
याप्रसंगी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व दानशूर व्यक्ती यावेळी उपस्थित होते. विविध ट्रक आणि टेम्पोच्या माध्यमातून मावळातील वाडी-वस्तीवर, गावागावांमध्ये धान्यवाटप करण्यास सुरूवात झाली आहे.
आमदार सुनील शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, मंडळे आणि दानशूर व्यक्ती यांना आम्ही आवाहन केले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंब, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कुठलाही व्यक्ती उपाशी राहू नये. यासाठी आम्ही किमान महिनाभर पुरेल इतका अन्नधान्य संच सुमारे २० हजार गरजु कुटुंबांना मोफत देण्याचा संकल्प केला आहे. दानशूर नागरिकांनी केलेली मदत आणि स्व:खर्चातून हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. आम्ही कोणालाही मदत करीत नाही. कर्तव्य भावनेतून आम्ही पुढाकार घेतला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक समन्वयातून मावळ तालुका राज्यात आदर्श निर्माण करतोय, असा विश्वासही आमदार शेळके यांनी व्यक्त केला.
जीवनावश्यक वस्तुंच्या संचमध्ये काय?
किमान महिनाभर पुरेल इतक्या अन्नधान्य साठ्यामध्ये आटा- ५ किलो, साखर- २ किलो, चहा पावडर- २५० ग्रॅम, तेल- २ किलो, तांदूळ- ५ किलो, तूरडाळ- १ किलो, मसाला- २०० ग्रॅम, बेसन पीठ- १ किलो, मीठ १/२ किलो, मसुर डाळ- १ किलो, डेटॉल साबण- २ नग आदी वस्तुंचा संच तयार केला आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.