उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीचा उमेदवार नाना काटे : अजित पवार
पिंपरी : शेवट्पर्यंत सर्वांशी चर्चा केली. आमच्या दहा इच्छुक उमेदवारांशी मी बोललो. राहुलबरोबर देखील मी बोललो. त्याला वेगवेगळे पर्याय दिले. उद्धव ठाकरे, पवार साहेब आणि प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आणि नेते मंडळींशी चर्चा करून अंतिम निर्णय झाला, आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी नाना काटे यांची उमेदवारी अंतिम केली. उद्धव ठाकरेंनी मला स्पष्ट सांगितले ‘ आपला आघाडीचा उमेदवार म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे याला शिवसेनेचा पाठिंबा राहील’. काँग्रेसशी देखील आम्ही बोललो आहे. ते आम्हाला मदत करणार आहेत. आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निवडणूक सोपी नाही परंतु, कष्ट आणि मेहनत घेतली तर निवडणूक अवघड नाही, असे राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
चिंचवड विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज उमेदवारी अर्ज थेरगाव निवडणूक कार्यालयात अधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर माध्यमांसमोर अजित पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, योगेश बहल, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, आज शेवटचा दिवस आहे. उशीर म्हणायच कारण नाही. चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस, शिवसेना आणि मी चर्चा केली. सर्वांचे मत आले आता निवडणूक लढवावी. बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचे उमेदवार सुप्रिया सुळे खडकवासल्यातुन ६५००० मतांनी पिछाडीवर होत्या, सहा महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत सचिन दोडके केवळ पावणेदोन हजार मतांनी पडला. त्यावेळी आम्ही उमेदवार उभे केले नव्हते. आम्ही त्यांना पुरस्कृत केले होते. त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते कोणाचे काम करत होते, तुम्ही विचारा. मतदान बांधील नसतं. एखादा पाच लाख मतांनी निवडनू आला तर त्याला पुढील वेळेस देखील तेवढीच मत मिळायला हवीत. मात्र पुढच्या वेळेस डिपॉझिट जप्त झालेले अनेक उमेदवार आहेत. पण इथे राष्ट्रवादीला मानणारा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि काँग्रेसच्या विचारांचा मतदार आहे, घटक पक्षांचा मतदार आहे. या सगळ्यांचा विचार करता आम्ही लक्ष देणार आहोत. कष्ट घेतले तर निवडणूक अवघड नाही. तिरंगी लढतीत मतं ट्रान्सफर व्हावी लागतात. दुसरीकडे झाली तर वेगळंच चित्र दिसतं. शहराचं माझं नातं आहे. पिंपरी चिंचवडची पूर्वीचे गाव, नंतर नगरपालिका, महापालिकेत रूपांतर होत असताना आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख झाली, या सर्व जडणघडणीत माझा वाटा आहे.