जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून संभाजीराजे आक्रमक; म्हणाले,..परिणाम भोगावे लागतील
जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच औरंगजेबाविषी एक विधान केले. हे विधान जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच भोवणार आहे. आव्हाडांच्या विधानानंतर सर्वच स्तरावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी राजे यांनी याबाबत ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बोताल वक्तव्य करणे बरे नव्हे याचे परिणाम भोगावे लागतील, असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.
दरम्यान, आव्हाडांच्या विधानानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जितेंद्र आव्हाड सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत. आव्हाड सारख्या विकृतीच्या तोंडून महान महापुरुषांची नावे येतात, त्यातून असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, जणू एक थोर समाजसेवकच बोलतो आहे. पण या विकृत वाणाची कथनी वेगळी आणि करणी वेगळी आहे, असं भाजपने म्हटलं आहे.