‘त्या’ 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती
मुंबई – अमरावती जिल्ह्यात रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या चाचणी अहवालात तपासणीमध्ये तफावत आढळून आली होती. या प्रयोगशाळांवर कारवाई करत त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी माहिती दिली.
राजेश टोपेंनी विधान परिषदेत सांगितले की, काही प्रयोगशाळा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले काही रिपोर्ट हे बनावट असल्याचे लक्षात आल्याने, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या 11 प्रयोगशाळांची मान्यता रद्द केल्या आहेत.
वाचा :-आमदार निधीत मोठी वाढ, आता पगारही पूर्ण मिळणार; अजित पवारांची घोषणा
कोरोनाच्या निदानासाठी आरटीपीसीआर तसेच रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट या चाचण्या करण्यात येतात. या चाचण्यांपैकी आरटीपीसीआर ही गोल्ड स्टँडर्ड चाचणी मानण्यात येते. कारण या आरटीपीसीआर चाचणीने 60 ते 65 टक्के अचूक निदान होते. तर रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट चाचणीद्वारे 30 ते 35 टक्के इतके अचूक निदान होते. प्रयोशाळेतील इतर कोणत्याही चाचण्यांप्रमाणे या चाचण्यांसही काही मर्यादा आहेत. लक्षण विरहीत व्यक्तींमध्ये संसर्गाच्या प्रमाणात कमी कालावधीत वेगवेगळा निकाल दाखविण्याची शक्यता आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, आता आयसीएमआर आणि एनएबीएल मानकानुसार पात्र असलेल्या प्रयोगशाळांना आयसीएमआरकडून मान्यता देण्यात येते. राज्यात 376 शासकीय आणि 141 खाजगी अशा एकूण 517 प्रयोगशाळांना आयसीएमआरने मान्यता दिलेली आहे.