गाव उजळायला गेला अन् कुटुंबावर अंधार पडला; विजेच्या धक्क्याने बाबा शेख यांचा मृत्यू
लातूर : विद्युत तारेचे काम करण्यासाठी गेलेल्या एका कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कामगाराचा मृत्यू झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मयत कामगाराच्या कुटुंबीयांनी केलीय. जोपर्यंत गुन्हा दखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
ही दुःखद घटना काल शनिवारी रात्री लातूरपासून जवळच असलेल्या नांदगाव येथे घडली आहे. मयत कामगाराचे नाव बाबा शेख असे आहे. शेख हे हलंगुळ येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी, आई वडील, भावंडे असा परिवार आहे. माझ्या घरात माझे पतीच कमावते होते. आता मी माझी तीन मुले कोणाकडे पाहून कसे जगावे, असा आर्त सवाल मयत कामगाराच्या पत्नीने केला आहे. बाबा शेख यांच्यासह अन्य दोन कामगार नांदगाव येथे विद्युत तारेचे काम करण्यासाठी आले असता गावचे सरपंच ढमाले यांनी त्यांना हटकले. त्यामुळे आम्हाला लाइनमन होळीकर आणि गायकवाड मॅडम यांनी हे काम करण्यास सांगितले असल्याचे सांगितले. मात्र तरीही विद्युत प्रवाह बंद असल्याची खात्री करून घ्या असे सरपंच ढमाले यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या समोरून बाबा शेख यांनी लाइनमन होळीकर यांना फोन लावला आणि विद्युत पुरवठा बंद असल्याची खात्री केली.
त्यानंतर त्यांनी पोलवर चढून कामाला सुरुवात केली. त्यांचे काम सुरू असतानाच विद्युत पुरवठा प्रवाहीत झाला आणि बाबा शेख यांना विजेचा धक्का बसला. त्यानंतर ते खाली कोसळले. पोलला आधार देण्यासाठी रोवण्यात आलेल्या सळईवर ते पडले. त्यांच्या पोटात सळई घुसली. सरपंच ढमाले आणि अन्य त्यांच्या साथीदारांनी बाबा शेख यांना तत्काळ लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टांनी घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र बाबा शेख यांच्या संतप्त नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित लाईनमन होळीकर, आणि गायकवाड मॅडम यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. तसेच गुन्हा दखल झाल्याशिवाय आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याची ठाम भूमिकाही त्यांनी घेतलीय.