“नागपूरमध्ये करोनाची तिसरी लाट आलीय”; पालकमंत्र्यांनी नागपूरकरांना दिला इशारा, म्हणाले…
नागपूर |
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत. असं असतानाच दुसरीकडे नागपूरचे पालकमंत्री आणि राज्य सरकारमधील नेते डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी विभागीय आय़ुक्तालयामध्ये पत्रकारांशी बोलताना रुग्णसंख्या मागील काही दिवसांमध्ये दुप्पट झाल्याचं सांगत ही तिसरी लाट असल्याचं म्हटलं आहे. नागपूर जिल्ह्य़ात गेल्या अनेक दिवसांपासून एक आकडी संख्येत नवीन करोनाग्रस्त आढळत होते. परंतु गेल्या दोन दिवसांत ही संख्या दोन आकडी झाली आहे.
आमच्या येथे तिसरी लाट आली आहे. लवकरच आपत्ती व्यवस्थापनाची बैठक होणार आहे. काही निर्बंध लावण्याचा विचार आहे. मात्र त्याआधी जनप्रतिनिधींशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. त्यामुळे येत्या तीन दिवसांत जिल्ह्य़ात पुन्हा कडक र्निबध लावण्यात येणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पालकमंत्री म्हणाले, नागपूर जिल्ह्य़ात रविवारी २४ तासांत १० नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यापूर्वी ही संख्या सातत्याने एक आकडी होती. ही जिल्ह्य़ात तिसरी लाट आल्याचं दर्शवते आहे. त्यामुळे आता नागपूर शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक र्निबध लावावे लागतील. त्याबाबत येत्या तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यानुसार हॉटेलच्या वेळा रात्री १० ऐवजी आता रात्री ८ पर्यंत, दुकाने रात्री १० ऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंत, शनिवार आणि रविवारला बाजार बंद ठेवण्यासारखे कटू निर्णय घेतले जाणार आहेत. त्यापूर्वी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स, हॉटेल संघटना, प्रसिद्धी माध्यमांतील अधिकारी, लोकप्रतिनिधींसह इतरांशी चर्चा करून त्यांचेही मत जाणून घेतले जाणार आहे. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. लवकरच जिल्हा अपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली जाईल. त्यानंतर र्निबध घोषित केले जातील. मंत्रिमंडळाच्याही बैठकीत या विषयावर चर्चा करून शासनाकडून र्निबध लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज हम बहुत दिनों बाद दोगुने पॉजिटिव मामलों पर आ गए हैं। हमारे यहां तीसरी वेव का आगमन हो गया है। जल्द ही आपदा प्रबंधन की बैठक होगी। कुछ निर्बंध लगाने का फैसला हुआ है लेकिन इसके संबंध में जनता के प्रतिनिधियों के साथ चर्चा करके अंतिम फैसला लेंगे: नीतिन राउत, महाराष्ट्र के मंत्री pic.twitter.com/Ef98bBBG8N
— ANI_HindiNews (@AHindinews) September 6, 2021