देशात २४ तासात ३१ हजार २२२ नवे रुग्ण; सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट
नवी दिल्ली –देशात कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात मंदावला असून ही दिलासा देणारी बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात ३१,२२२ नवे कोरोना रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी ३० लाख ५८ हजार ८४३ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात आढळेल्या ३१,२२२ रुग्णांपैकी एकट्या केरळ राज्यात १९,६८८ रुग्ण बाधित आढळले आहेत.
गेल्या ७२दिवसांपासून कोरोनाचा आलेख हा घसरताना पाहायला मिळत आहे. दिवसागणिक आता कोरोना रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली आहे. सध्या देशात ३ लाख ९२ हजार ८६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात असून, रिकव्हरी रेट हा ९७.४८ टक्के इतका झाला आहे.
गेल्या २४ तासात २९० जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे देशात ४ लाख ४१ हजार ४२ जणांना जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत ३ कोटी २२ लाख २४ हजार ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच लसीकरण मोहिमेलासुद्धा वेग आला आहे.