डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला ‘हा’ संकल्प!
मुंबई । प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना आणि राज्य घटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
श्री. पवार म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली.
तसेच, डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करूया! दरवर्षी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनेकांनी, कोरोना संकटामुळे यंदा आपापल्या घरुनंच डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केल्याबद्दल त्यांचेही श्री. पवार यांनी आभार मानले आहेत.