ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट, लहान मुलांसाठी धोक्याचा इशारा
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. गेल्या सहा दिवसात सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 25 हजार 420 नवे रुग्ण सापडले तर 44 हजार 103 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा कमी आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 385 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 3 कोटी 16 लाखांच्यावर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात सक्रीय रुग्णांमध्ये 19 हजाराने घट झाली. सध्या देशात 3 लाख 28 हजार सक्रीय रुग्ण आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी दुसऱ्या बाजूला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका पॅनेलने पंतप्रधान कार्यालयाला तिसऱ्या लाटेबद्दल सावध केलं आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या समितीने ऑक्टोबरमध्ये कोरोना संसर्ग उच्चांकी पातळी गाठेल असा इशारा दिला आहे. तसंच याचा लहान मुलांवर परिणाम होईल असंही म्हटलं असून येणाऱ्या संकटाला सामोरं जाण्यासाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. रुग्णालयांनी यंत्रणा सज्ज ठेवावी असा सल्लाही समितीने दिला आहे.
निती आयोगानेसुद्धा केंद्र सरकारला तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. कोरोनाचं संकट टळलेलं नसून तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत धोकादायक असू शकते असं निती आयोगाने म्हटलं आहे. तसंच या लाटेचा सामना करण्यासाठी दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवले पाहिजेत असंही निती आयोगाने म्हटलं.
तिसऱ्या लाटेचा धोका हा सप्टेंबरमध्ये जाणवण्याची शक्यता निती आयोगाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या 20 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागेल. तसेच दर दिवशी 4 ते 5 लाखांपर्यंत रुग्णांना संसर्ग होण्याची भीती निती आयोगाने व्यक्त केली आहे.
सध्या कोरोनामुळे देशातील 8 राज्यात लॉकडाऊन सदृश्य निर्बंध आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडु, मिझोराम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या ठिकाणी आधीच्या लॉकडाऊनसारखेच निर्बंध लागू करण्यात आले आहेत.