रिक्षा चालक-मालकांचे राज्यभरातील आरटीओ कार्यालयावर आंदोलन
कष्टक-यांचे नेते बाबा कांबळे यांची माहिती
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांसाठी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील आरटीओ कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 27) आंदोलन करून प्रशासनावर दबाव आणला जाणार आहे, अशी माहिती ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
रिक्षा चालक-मालकांसाठी परिवहनखात्याअंतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. ओला आणि उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावी. इन्शुरन्सचे वाढलेले दर कमी करावेत. मुक्त रिक्षा परवाना बंद करण्यात यावा. प्रत्येक आरटीओ कार्यालयात २५० मीटरचा पासिंग ट्रॅक उभारावा. नवीन रिक्षाची ब्रेक टेस्ट बंद करण्यात यावी, यासह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात यासाठी मंगळवारी (दि. २७) राज्यातील सर्वच आरटो कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रशासनाला निवेदन सादर केले जाणार आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी दहा वाजता आणि पुणे आरटीओ कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे आरटीओ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, बीड जिल्ह्याचा दौरा बाबा कांबळे यांनी केला आहे. यामुळे रिक्षा चालकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. सर्वच जिल्ह्यात आंदोलन तिव्र होणार असून मागण्या मान्य न झाल्यास रिक्षा बंदसारखे आंदोलन सातत्याने करण्यात येईल, असाही इशारा बाबा कांबळे यांनी दिला आहे.