राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातलंही आम्ही ताब्यात घेऊ- नवाब मलिक
मुंबई |
देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्या मागेही लावत आहेत. भाजपाला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आज देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यास नकार दिल्यानंतर, सरकारी यंत्रणा माझ्या आणि कुटुंबाच्या मागे लागली आणि छळ करण्यास सुरुवात केली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आवाहन दिले आहे.
“ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही,” असे संजय राऊत म्हणाले.