breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निघोजे बंधाऱ्याला गळती : पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी कपातीचे संकट!

महापालिका आयुक्तांची बैठक : गळती रोखण्यासाठी उपाययोजना करणार

पिंपरी : इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती लागली असून, आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात पुन्हा घट झाली आहे. धरणातून अवघे ४५ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहरासाठी मिळत आहे. ४० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाइन बैठक झाली. यामध्ये पाणी पुरवठा सुरळीत करण्यासह निघोजे बंधाऱ्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला केली. शहराला गेल्या सव्वाचार वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. शहरासाठी आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी राखीव आहे. मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात ८५, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)कडून २० असे ६१५ एमएलडी पाणी शहराला देण्यात येते.

हेही वाचा – हनुमान चालिसा पाकिस्तानात म्हणायची का? देवेंद्र फडणविसांचा ठाकरेंना सवाल

आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत सोडून निघोजे बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे उचलले जाते. त्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून आंद्रा धरणातून ४५ एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे ४० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे. आंद्रा धरणातून पाणी कमी येत असल्याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून ऑनलाइन बैठक घेतली. आंद्रा धरणातून पुरेसे पाणी इंद्रायणी नदीत सोडावे, निघोजे येथील बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशा सूचना पालिकेच्या वतीने करण्यात आल्या. निघोजे बंधाऱ्यात पाण्याचा पुरेसा साठा होत नसल्याने दोन पंपांऐवजी एकाच पंपाव्दारे पाणी उपसा केला जात आहे.

बंधाऱ्याच्या दुरुस्तीला आचारसंहितेचा अडसर

निघोजे बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी पालिकेकडून पाटबंधारे विभागाकडे केली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून दुरुस्ती केली जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

शहरासाठी आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी राखीव आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यात पुरेसे पाणी येत नाही. पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

– श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button