औरंगाबादच्या ‘माझी स्मार्ट बस’ला प्रथम पुरस्कार
औरंगाबाद | औरंगाबाद माझी स्मार्ट सिटी बसने अर्बन मोबिलिटी गटात इंडिया स्मार्ट सिटी अॅवॉर्ड्स (आयएसएसी) २०२० जिंकले आहे, अशी घोषणा भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शुक्रवारी केली.
अवासन व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत अमृत, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि स्मार्ट सिटीज मिशनच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त अवासन व शहरी कामकाज विभागाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा आणि स्मार्ट सिटीज मिशन संचालक कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे आणि उर्वरित स्मार्ट सिटी टीम कार्यक्रमास दूरचित्रसंवादाद्वारे सहभागी झाले.
तत्कालीन युवा सेने नेते आणि विद्यमान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी २०१९ मध्ये माझी स्मार्ट बस प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले होते.
१०० बसेस सोबत स्मार्ट बस प्रकल्प ३२ मार्गावर पोहोचतो. पूर्ण क्षमतेमध्ये स्मार्ट सिटी बसेस एकाच दिवसात तब्बल २२ हजार किलोमीटर नेटवर्क व्यापतात. आतापर्यंत स्मार्ट बसने एकूण ५२ लाख किलोमीटर धावताना ८७ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवेचा लाभ दिला आहे.