औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा मंजूर केलेल्या प्रस्तावास शिंदे सरकार पुन्हा एकदा मंजुरी देणार
मुंबईः ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा मंजूर केलेल्या प्रस्तावास शिंदे सरकार पुन्हा एकदा मंजुरी देणार आहेत. यासाठी शिंदे सरकारने शनिवारी तातडीने मंत्रीमंडळ बैठक बोलवली असून, या बैठकीत हा प्रस्ताव पुन्हा नव्याने मंजूर केला जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. दरम्यान, नामांतरांच्या मुद्यावरुन श्रेय लाटण्यासाठी हा सर्व प्रकार केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.
अन्य निर्णयांचे काय?
तीन महत्त्वाच्या प्रस्तावांबरोबरच मराठा समाजाच्या प्रलंबित मागणीनुसार निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णयही ठाकरे सरकारने त्या वेळी घेतला होता. याबाबत शिंदे सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून वांद्रे येथील शासकीय वसाहतीबाबत निर्णयालाही शिंदे सरकार हिरवा कंदील दर्शवणार का, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.