निगडी प्राधिकरणातील विद्युत विभाग उठला रहिवाशांच्या मुळावर
- वीज बिल न भरल्यास अवघ्या पाच तासातच कनेक्शन तोडले जाते
- भाजपाचे अनुप मोरे यांनी घेतला अधिका-यांचा खरपूस समाचार
पिंपरी / महाईन्यूज
निगडी प्राधिकरणातील नागरिकांचा विद्युत पुरवठा खंडीत करून विद्युत विभागाकडून नाहक त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना विद्युत कनेक्शन तोडण्याचा कर्मचा-यांनी सपाटा लावला आहे. विद्युत विभागाच्या कर्मचा-यांकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी विद्युत अधिका-यांचा चांगलाच समाचार घेतला. कोणाच्या सांगण्यावरून हे काम केले जात आहे, असा जाब त्यांनी अधिका-यांना विचारला.
निगडी प्राधिकरणातील रहिवाशांच्या घराचा विद्युत पुरवठा विस्कळीत होत आहे. आता तर काही कारण नसताना नागरिकांचे विद्युत कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी अनुप मोरे यांच्याकडे तक्रारी केली. या समस्यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी त्यांनी निगडी विद्युत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. तरी देखील अधिका-यांना जाग आली नाही. अनेकदा सांगून देखील गेंड्याची कातडी घातलेल्या अधिका-यांनी विरोधातील चाल सोडलेली नाही. त्याची झळ प्राधिकरणातील नागरिकांना नाहक सोसावी लागत आहे.
त्यावर बुधवारी (दि. 17) अनुप मोरे यांनी विद्युत विभागात जाऊन अधिका-यांकडे विचारणा केली. परस्पर विद्युत कनेक्शन का तोडले, तोडण्यापूर्वी नोटीस पाठवायला हवी होती. कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही हे करत असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत मोरे यांनी अधिका-यांना सुनावले. विद्युत पुरवठा खंडीत होतो त्यावेळी आपल्याकडून कामाची तत्परता दाखवली जात नाही. वीज बिल नाही भरले की पुढील पाच तासात कनेक्शन कट केले जाते. नागरिकांना वेळ दिला पाहिजे. त्यांना पूर्वसूचना दिली पाहिजे. कनेक्शन तोडण्यापूर्वी त्यांना रितसर नोटीस देणे बंधनकारक आहे. हे न करता थेट कनेक्शन तोडण्याची भूमिका नागरिकांच्या विरोधात आहे, अशा शब्दांत अनुप मोरे यांनी अधिका-यांचा समाचार घेतला.