ऊस वाहतूक गाडी मालकाने ऊसतोड मजुरांसह लहान मुलांना ठेवलं डांबून
बीड | राज्यात सर्वत्र कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, याच कामगार दिनादिवशी सामाजिक न्यायमंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या जिल्ह्यात धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर घेतलेल्या उचलीमधील पैसे फिरल्याने १३ महिला-पुरुष मजुरांसह त्यांच्या ९ लहान मुलांना डांबून ठेवलं आहे. असा आरोप पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. यामुळे वृद्ध आजीसह इतर नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या वारोळा गावातील व गेवराईच्या भेंड खुर्द गावातील ऊसतोड मजूरांनी ट्रॅक्टर मालक दत्ता दगडू गव्हाणे यांच्याकडून ऊसतोडणीसाठी पैशाची उचल घेतली होती. त्यांनतर त्यांनी कर्नाटक येथील ओम शुगर साखर कारखाना येथे जाऊन ६ महिने ऊस तोडणीचे कामही केले आहे. तर गेल्या ८ ते ९ दिवसांपूर्वी कारखाना बंद पडला आहे. मात्र, ऊसतोडीसाठी घेतलेल्या ऊचलीपैकी काही पैसे मजुरांकडून फिरतात. यामुळे गाडी मालक दत्ता गव्हाणे यांनी त्यांना डांबून ठेवल्याचा आरोप वृद्ध केसरबाई आडगळे, परमेश्वर गायकवाड यांच्यासह अनेकांनी केला आहे.
या विषयी तक्रारदार ऊसतोड मजूर परमेश्वर गायकवाड म्हणाले की, मी माझी बायको, आई, वडील, भाऊ त्याची बायको, कारखान्याला ऊस तोडण्यासाठी गेलो होतो. मात्र, १५ दिवसांपूर्वी माझा मुलगा खूप आजारी पडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मी गावी बीडला आलो होतो. मात्र, गेल्या ८ दिवसांपूर्वी कारखान्याचा पट्टा पडला आहे. कारखान्याहून ८ दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आणि इतर मजूर निघाले आहेत. ते अद्यापपर्यंत घरी आले नाहीत.
उचलीमधील फिरलेल्या पैशामुळे दत्ता चव्हाणने त्यांना डांबून ठेवलं असून त्यांना मारहाण देखील केली, असा आरोप गायकवाड यांनी केला असून ते म्हणाले, की आम्ही त्याला म्हणालो आता आमच्याकडे पैसे नाहीत ६ महिने कारखान्यात होतो. तुम्हाला एक महिन्यानंतर उचल सुरू झाल्या की देऊ. तोपर्यंत आमच्या घराचे कागदपत्र तुमच्याकडे ठेवा. मात्र तो ऐकत नाही. त्यांनी सर्वांना कुठंतरी डांबून ठेवलं आहे. तर या मजुरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.