बर्ड फ्लूला रोखण्यासाठी केंद्राचे पथक केरळ, हरियाणाला जाणार
नवी दिल्ली – कोरोना महामारी अजून आटोक्यात आलेली नाही. तिच्याबरोबर झुंज सुरू असतानाच आता बर्ड फ्लूचे नवे संकट देशासमोर उभे ठाकले आहे. त्याचा फैलाव देशातील ४ राज्यांमध्ये झाला आहे. तेव्हा त्याला रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञांची खास पथके हरियाणा आणि केरळला पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
वाचा :-पेट्रोल आणि डिझेल कडाडले मुंबईत पेट्रोलची नव्वदी पार
पशुपालन विभागाने बर्ड फ्लू विषाणूच्या नमुन्यांची चिकित्सा केली आहे. त्यानंतर आता या विभागातील तज्ज्ञांची पथके हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात आणि केरळमधील अलप्पूझा आणि कोट्टायम जिल्ह्यात जाणार आहेत. बर्ड फ्लू अजून तरी नागरिकांमध्ये पसरल्याची घटना समोर आलेली नाही. परंतु या घातक विषाणूंची भीषणता लक्षात घेऊन त्याचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी केंद्र सरकारने खास मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत तयार केलेली तज्ञांची पथके केरळ आणि हरियाणाला जाणार आहेत. ही पथके या परिसरातील संशयित रुग्णांची तपासणी करणार आहेत. बर्ड फ्लूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी दिल्लीत नियंत्रण कक्ष बनवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.