४८ तास उलटून गेले तरीही मंदिरातील चोरीचा छडा लागेना, अखेर गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला केली सुरुवात
जालना : ४८ तास उलटून गेले तरीही मंदिरातील चोरीचा छडा लागलेला नसल्याने जालन्यात आता गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. मंदिरातल्या मुर्ती चोरीला गेल्यामुळे गावकऱ्यांच्या भावना शिगेला पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे..
जालन्यातील जांब समर्थ येथील राम मंदीरातून ६ पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलिसांची ७ पथकं आरोपींच्या शोधात रवाना झाली आहे. मूर्ती चोरीला गेल्यानं कालची आणि आज सकाळची आरती होऊ शकली नाही. श्रद्धास्थान असलेल्या मुर्त्या चोरीला गेल्याने जांब समर्थचे नागरीक संतप्त झाले आहेत.
गेल्या ४८ तासात मूर्ती न मिळाल्यास उद्यापासून अन्नत्याग आंदोलन केल्या जाईल असा ईशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. परंतु, ४८ तास उलटून गेले तरी चोरीचा छडा न लागल्याने गावकऱ्यांनी शांततेच्या मार्गाने अन्नत्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. गावातील अबाल वृध्द, तरुण, लहान मुले देखील या आंदोलनात सामील झाल्याने पोलीस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा वेगाने एका-एका मुद्यावर तपास करत आहे.