जगावं की मरावं एवढाच प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ नाटकापुरताचं’ मर्यादित आहे असे नसून. हा प्रश्न येणार्या काळात पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाला पडेल. याचे कारण लक्षात येत नाही का? तर थांबा आणि आजूबाजूला नजर फिरवा. निसर्गाचे निरीक्षण करा. निसर्गातील प्रत्येक घटक तुमच्याकडे याचना करताना दिसेल. जणू ते सर्वजण सांगत आहेत.
’हा नाश थांबवा भूमातेचे तनमन जळत आहे. ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे, आहे आपली धरणीमाय, आपली भूमाता हे सत्य घेऊन ढसाढसा रडत आहे. आणि आपण तिचे अश्रू पुसायचे सोडून तिला अधिक चटके देत आहोत. सहनशीलता असावी तर ‘पृथ्वीसारखी’ असे म्हटले जाते. आपण तिच्यावर जनसंख्येचे अफाट ओझे लादतच चाललो आहोत. विज्ञानयुगातही जगाची लोकसंख्या ७ अब्जपेक्षा जास्त असावी, हे आपले दुर्दैवच मानावे लागेल. लोकसंख्येचा भस्मासूर आपणासर्वांना गिळण्यासाठी ‘आ’ वासून बसला आहे, तरी आपण मानव असतांना आधुनिकतेच्या मागे धावत आहे. याचा परिणाम नैसर्गिक साधनसंपत्ती, अपव्यय, संसाधनांचा तुटवडा, रोगराई, उपासमार, प्रदूषणावर होताना दिसून येत आहे.
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली असून सजीवसृष्टीच्या अस्तित्त्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या र्हासाला फक्त आणि फक्त मनुष्यच कारणीभूत आहे, असे मला वाटते ’माणसा तुझ्या स्थितीचा तूच अपराधी आहेस.
भारतभूमीचे सौंदर्य दाखवण्यासाठी भारतातील खेडी पुरेशी आहेत, पण या सौंदर्याला नजर लागली ब्रिटिशांची, केवळ त्यांचीच नाही तर खुद्द भारतीयांची सुद्धा. महात्मा गांधींनी हे ओळखले होते आणि त्यांनी लोकांना ’खेड्याकडे चला’ असा संदेश दिला. खेडी वाचली तर पर्यावरण वाचेल ही दूरदृष्टी महात्मा गांधीजींकडे होती, असे मला वाटते खेड्यामध्ये एक संपन्न जीवन होतं, मातीची घरे, शेणामातीने सारवलेली अंगणे, घराभोवती परसामध्ये लावलेली पर्यावरण पुरवक झाडे, औषधीवनस्पती, घरांची रचना, गावातील पाणवठ्याची सोय, कठडे बांधलेल्या विहिरी, केरकचरा विल्हेवाट, शेणापासून शेणखत, गोबरगॅस, ऋतुमानानुसार, घेतली जाणारी पिके, शेणखतावर आधारित शेती, सांडपाण्याची व्यवस्था, गुरांना चराईची राखीव जागा. यांसारख्या बर्याच आदर्श आणि पर्यावरणपूरक गोष्टी खेड्यामध्ये होत्या. परंतु पाश्चिमात्य संस्कृतीच्या हव्यासामुळे आम्ही या सौंदर्याला गालबोट लावले. एकेकाळी समृद्ध असणारी खेडी आज भकास माळराने दिसू लागली आहेत. याला जबाबदार आपणच. ही झालेली चूक अजूनही सुधारता येइल. त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकवेळी सजगता ठेवायला हवी. आपल्या आजूबाजूच्या निसर्गाला त्रास होईल, असे वर्तन आपण टाळायला हवे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. जितकी सुबत्ता येते तितक्या गरजा वाढतात. आपल्या गरजा कमी केल्यास नैसर्गिक घटकांचा अतिवापर होणार नाही. उदा. आज प्रत्येकाकडे गाडी आहे, त्यासाठी लागणारे इंधन “अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे गाडीचा वापर गरजेपुरता केल्यास आपण इंधन बचत करू शकतो.