‘देवेंद्र फडणवीस घरं आणि पक्ष फोडण्यात व्यस्त..’; सुप्रिया सुळे यांचा आरोप
मुंबई : नागपुरात पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, यावरून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्राया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडण्यात वेळ घालवला नसता तर ही वेळ आली नसती, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवली गेली, या कृतीचं मी समर्थन करणार नाही. ते माझे राजकीय विरोधक आहेत मात्र तरीही जेव्हा ते तुम्हाला भेटायला येत आहेत तेव्हा अशा गोष्टी होणं योग्य नाही. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत केली पाहिजे. असं असलं तरीही भाजपाचं नेतृत्व पक्ष फोडणं, घरं फोडणं त्यासाठी इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यांचा वापर करण्यात इतके मग्न असतात की त्यांना बदल करण्यासाठी किंवा विकास करण्यासाठी वेळ नसतो हे त्यांच्या कृतीतून दिसतं.
जालन्यात जेव्हा महाराष्ट्रातल्या सुना, लेकी आणि मुलांवर हल्ला झाला तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. नागपूरमध्ये ज्या घटना घडल्या त्यात मी हे म्हणेन त्यांची गाडी अडवणं योग्य नाही कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र त्याचवेळी मी हे म्हणेन की देवेंद्र फडणवीस यांनी सगळा जो वेळ त्यांच्याकडे घरं फोडणं आणि पक्ष फोडण्याकडे दिला नसता आणि विकासाला वेळ दिला असता तर ही वेळ आली नसती, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.
हेही वाचा – परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा अखेर लग्नबंधनात अडकले
दुष्काळ, बेरोजगारी आणि महागाई हे प्रश्न राज्यात आणि देशात आहेत. देशाच्या सुरक्षितेतचा विषय महत्वाचा आहे. कॅनडाने भारतावर मोठा आरोप केला आहे. तसंच काश्मीरचा प्रश्न आहेच. शिवाय मणिपूरचा प्रश्नही सुटलेला नाही. मायबाप जनता बेरोजगारीची झळ सोसते आहे. अशात भाजपाकडून कट कारस्थान सुरु आहे त्याचं मला आश्चर्यही वाटणं बंद झालं आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं त्यात बेरोजगारी, महागाई वगैरे कशावरही चर्चा झाली नाही. महिला विधेयकाचा जुमला फक्त दिसला. महिला खासदार जेव्हा बोलू लागल्या तेव्हा भाजपाचे नेते गोंधळ घालत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं होतं की नव्या इमारतीत आपण जुनी कटुता मागे ठेवू. त्यामुळे आम्ही मोदींचं कौतुक केलं होतं. चांगल्या गोष्टी संसदेत होणार असतील, संसदेचा सन्मान राखणार असतील तर आम्ही साथ देणार हे मान्य केलं होतं. मात्र पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपा खासदाराने महिलांचा अपमान केला असाही आरोप सुप्रिया सुळेंनी केला.