लोकसेवेचा पाया मजबूत करा- बच्चू कडू
- विदर्भ-मराठवाडय़ातील प्रहारच्या जिल्हाध्यक्षांची बैठक
अकोला |
पक्षात नवे प्रवाह जोडत राज्यभर ताकदवान संघटन उभे होत असून सर्वानी ध्येय निश्चित करून कामाला लागावे, आगामी काळात किमान १५ आमदार निवडून गेलेच पाहिजेत, हेच आपले लक्ष्य आहे. लोकांची सेवा हा आपला पाया असून तो अधिक मजबूत झाला तरच प्रहार मजबूत होईल, असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी रविवारी येथे केले. शासकीय विश्रामगृहावर प्रहारच्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ९ ऑगस्टपासून सुरू होणारी राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम यशस्वी करा.
आजवर काम किती केले, यापेक्षा प्रहारशी किती लोक जोडले यावरून मोजमाप होणार आहे. लोकांच्या प्रश्नावर आंदोलने हे आपले महत्त्वाचे अंग आहे, त्याची आठवण ठेवून सत्ता कोणाचीही असो आपली नाळ कायम गरीब, सामान्य माणसाशी ठेवा, असेही बच्चू कडू म्हणाले. ९ ऑगस्टला क्रांतीदिन, १३ ऑगस्टला महाराणी अहिल्यादेवी स्मृती दिन आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन हे आपले महत्त्वाचे उत्सव आहेत. स्वातंत्र्यदिन हा सणासारखा साजरा करावा, त्या सोबतच प्रहार सदस्य नोंदणी करा, असेही त्यांनी सांगितले. राजकीय पक्ष नव्हे तर प्रहार एक व्यापक परिवार करायचा असल्याने प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी सांगितले. कोणत्याही जिल्ह्यत पक्षामध्ये गटबाजी सहन केली जाणार नाही, थेट बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांनी दिला. सूत्रसंचालन पुरुषोत्तम आवारे यांनी केले, तर आभार अॅड. सुधाकर खुमकर यांनी मानले.
अनेकांचा प्रहारमध्ये प्रवेश
राजकुमार नाचणे यांच्या पुढाकारातून मूर्तिजापूर तालुक्यातील प्रदीप फुके निंभा, अक्षय म्हसाये, धानोरा पाटेकर, निखिल टोम्पे, कंझरा, बंडू घाटे, राजुरा घाटे हे चार सरपंच आणि नीलेश गिरी, उपसरपंच कंझरा, अनिल इंगोले सदस्य निंभा यांनी बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये प्रवेश घेतला. जालना जिल्ह्यतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याने सुद्धा विदूर लाघाटे यांच्या पुढाकारात पक्षात प्रवेश घेतला.