रोहित-विराटइतकाच संजू सॅमसन महत्त्वाचा; कर्णधार रियान परागचे वक्तव्य

Riyan Parag | आगामी ‘आयपीएल’ हंगामाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार रियान पराग याने संघातील मोठ्या बदलांवर भाष्य करत संजू सॅमसनच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब केले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याइतकाच सॅमसन आपल्या संघासाठी महत्त्वाचा होता, असे स्पष्ट मत परागने व्यक्त केले.
२८ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हंगामापूर्वी राजस्थान आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळाडूंची अदलाबदल झाली. यात संजू सॅमसन चेन्नईकडे गेला, तर रवींद्र जडेजा आणि सॅम करन राजस्थानमध्ये दाखल झाले. सॅमसनच्या जाण्यानंतर राजस्थानच्या नेतृत्वाची धुरा रियान परागकडे सोपविण्यात आली आहे.
हेही वाचा : रूपाली चाकणकर फरार; रूपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ
संजूबाबत बोलायचे झाल्यास, त्याची जागा घेऊ शकेल असा खेळाडू मिळणे अशक्यच आहे. आम्ही त्याच्यासारखे कौशल्य असलेला खेळाडू शोधू शकतो, पण त्याच्यासारखा प्रभाव पाडणारा खेळाडू मिळणार नाही. जसे विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना पर्याय नाही, तसेच संजूलाही पर्याय नाही, असे परागने सांगितले.
गेल्या हंगामातील चुका लक्षात घेत यंदा संघ अधिक सज्ज असल्याचेही त्याने नमूद केले. “गेल्या वर्षी ५-६ सामने आम्ही शेवटच्या षटकात गमावले. त्या सामन्यांमध्ये थोडी अधिक अचूक रणनीती असती, तर आम्ही बाद फेरीत पोहोचू शकलो असतो. यंदा आम्ही शेवटच्या टप्प्यातील खेळ अधिक भक्कम करण्यावर भर देत आहोत,” असे परागने स्पष्ट केले.





