टी-२० संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यर! १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात एन्ट्री

T20 Team India Squad | भारतीय टी-२० क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. सातत्याने असलेल्या खराब फॉर्ममुळे भारताचा विश्वविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला मोठा धक्का बसला असून, त्याला कर्णधारपदावरून पायउतार करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्याला या संघात स्थानही मिळवता आलेले नाही. सूर्यकुमारच्या जागी आता धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर युवा फलंदाज तिलक वर्मा उपकर्णधार असेल. निवड करण्यात आलेला हाच टी-२० संघ आगामी आयर्लंड दौरा, इंग्लंड दौरा आणि त्यानंतर होणाऱ्या एशियन गेम्ससाठी खेळणार आहे.
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची संघात एन्ट्री!
या संघ निवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे १५ वर्षांचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीची भारतीय संघात झालेली निवड. वैभवने आयपीएल २०२६ च्या हंगामात वादळी कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले होते. याच उत्कृष्ट कामगिरीचे फळ म्हणून त्याला थेट भारताच्या वरिष्ठ टी-२० संघात संधी मिळाली आहे. जर वैभवला या दौऱ्यात पदार्पणाची (Debut) संधी मिळाली, तर तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरेल.
सिराजचे पुनरागमन; प्रिन्स यादवला संधी
स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही टी-२० मालिकांमध्ये खेळणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा अर्शदीप सिंगसह मोहम्मद सिराज आणि प्रिन्स यादव यांच्यावर असेल. आयपीएलमधील चमकदार कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सिराजचे टी-२० संघात पुनरागमन झाले आहे, तर प्रिन्स यादवला एकदिवसीय (ODI) संघानंतर आता टी-२० संघातही स्थान मिळाले आहे. हर्षित राणा देखील वेगवान गोलंदाजीत पर्याय असेल.
फिरकी विभागात निवड समितीने मोठा निर्णय घेताना अनुभवी कुलदीप यादवला संघातून वगळले असून, त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी दिली आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आपले स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
हेही वाचा
मान्सून ४८ तासांत महाराष्ट्रात धडकणार! राज्याला पुढील ४ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’
याशिवाय, संघात अष्टपैलू (All-rounders) खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश आहे. यष्टीरक्षक (Wicketkeeper) म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशन या दोघांना संधी मिळाली असून, सलामीवीर अभिषेक शर्मा आपली जागा टिकवून आहे.
आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-२० संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
जपानमध्ये होणाऱ्या आशियाई गेम्स २०२६ मध्ये पुरूष क्रिकेट सामन्यांकरिता देखील भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचं नेतृत्त्वदेखील श्रेयस अय्यर करणार आहे. तर या स्पर्धेकरता जसप्रीत बुमराह संघात परतला आहे आणि मोहम्मद सिराज-प्रिन्स यादव या खेळाडूंना ड्रॉप केलं आहे.
आशियाई गेम्स २०२६ साठी भारताचा संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरूण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.





