भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर स्टेडियमवर
दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द! पावसाने खेळाडूंना मैदानात उतरूच दिलं नाही
कानपूर : भारत विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) सुरू झाला असून पहिल्या दिवसापासून या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आता या सामन्यात शनिवारी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळच होऊ शकलेला नाही. दुपारपर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहण्यात आली, मात्र खेळ दुसऱ्या दिवशी होऊ शकणार नाही असं लक्षात आल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यामुळे आता रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ पुन्हा सुरू होईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.
या सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेकीलाही पावसामुळे उशीर झाला होता. पण नंतर सामना सुरू झाला. सुरुवातीला बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि शादमन इस्लाम यांनी संयमी सुरुवात केली होती. परंतु, आकाश दीपने झाकिरला शुन्यावर बाद केले, तर शादमन इस्लामला २४ धावांवर बाद केले.
पण त्यांनंतरही बांगलादेश संघाचा कर्णधार नजमुल हुसैन शान्तो आणि मोमिनुल हक यांनी बांगलादेशचा डाव सावरला आणि अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी दुसर्या सत्रातही चांगली सुरूवात केली होती. पण २९ व्या षटकात आर अश्विनने शान्तोला ३१ धावांवर बाद केले. तो बाद झाल्यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात झाली. पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पहिला दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा बांगलादेशने ३५ षटकात १०७ धावा केल्या होत्या. मोमिनुल हक ८१ चेंडूत ४० धावांवर नाबाद राहिला, तर मुश्फिकुर रहिम ६ धावांवर नाबाद राहिला.
दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भारताला दुसरा सामना जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश देण्याची संधी आहे. तसेच बांगलादेशला जर मालिका पराभव टाळायचा असेल, तर त्यांना दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.





