महाराष्ट्रात एका टप्प्यात होणार निवडणुका? जाणून घ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील ११ राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्य़ाचबरोबर राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हा अधिकारी यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
त्याचबरोबर मतदानाच्या टक्केवारीवर होणारा परिणाम आणि मतदारांमधील नैराश्य टाळण्यासाठी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या, अशी मागणी भाजपा वगळता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी दिवाळी, देव दिवाळी आणि छठपूजा यासारख्या सणांचा विचार करावा, अशी सूचना राजकीय पक्षांनी केली आहे.
हेही वाचा – ‘शिवसेना फुटायला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी फुटायला शरद पवार जबाबदार’; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
निवडणुकीत पैशांचा वारेमाप होणारा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्य़ात यावी. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी. आठवड्याच्या मधल्या काळात निवडणूक घेण्यात याव्यात. फेक न्यूज रोखण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. मतदान केंद्रावर सोयी-सुविधा देण्यात याव्य़ात. वृद्ध मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्यवस्था करण्य़ात यावी, अशा महत्त्वपूर्ण सुचना राजकीय पक्षांनी केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.





