पिंपरीत संदीप वाघेरे यांच्यावतीने रावण दहनाचा नेत्रदिपक सोहळा उत्साहात
अभूतपूर्व गर्दीचा उच्चांक, नवमहाराष्ट्र क्रिडांगणावर 70 फुटी भव्य रावणाची प्रतिकृती तसेच कुंभकर्ण व मेघनाथ यांची ६० फुटी प्रतिकृती
पिंपरी : पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावतीने साजरा करण्यात आला. नवमहाराष्ट्र क्रिडांगणावर 70 फुटी भव्य रावणाची प्रतिकृती तसेच कुंभकर्ण व मेघनाथ यांची ६० फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्याचे दहन करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, मुळशी पॅटर्न फेम रमेश परदेशी, माजी नगरसेवक नवनाथ जगताप, राहुल कलाटे, हर्षल ढोरे, सचिन चिखले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष तुषार कामठे, संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे,पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, भरत लांडगे मान्यवर उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधताना वाघेरे म्हणाले की, पूर्वी विविध खेड्यांमध्ये विभागलेल्या गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थापना करण्यात आली. मात्र पिंपरी गाव कायम विकासापासून वंचित राहिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपण मला नगरसेवक पदी संधी दिली. या संधीचे सोने करून पिंपरी गावचा विकास करण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला आहे.
३५० वर्षापूर्वी कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला शिवाजी महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा आणि या राज्याला रयतेच राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनाच आजपर्यंत दैवत मानून मी समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजासाठी काम करीत असताना मी मोठ्या प्रमाणावर आग्रही भूमिका घेत असतो, राजकारण हा माझा पिंड नव्हता आणि नसणार… मला ते जमणार हि नाही. समाजासाठी काही करायचे असेल तर निश्चयी विचार असावे लागतात. काय योग्य किंवा काय अयोग्य हे ठरवायला लागतं आणि कशा मार्गानं पुढे जायला हवं हे ही ठरवावे लागते. लोकप्रतिनिधीची काम समाजाला दिशा देण्याचे आहे. जो समाजाला दिशा दाखवतो, तोच समाजामध्ये जनसेवक म्हणून कार्य करू शकतो. अनेक संकटांवर मात करून पुढे जातो तोच खरा विजेता ठरतो.
दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाचे संकट आले. पिंपरी चिंचवडची गरज लक्षात घेऊन मी जिजामाता रुग्णालयास पन्नास बेड, व्हेंटिलेटर हाइप्लो मशीन तसेच म्युकर मायकोसिस आजारावरची पंधरा लाखाची उपकरणे भेट दिली. पिंपरी गावातील शितळा देवी व महालक्ष्मी मरीआई मंदिराचा जिर्णोद्धार केला, राम मंदिर ही प्रस्तावित आहे. याबरोबरच पिंपरी गावात विविध सांस्कृतिक महोत्सव सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. दहीहंडी, रावण दहन कार्यक्रम सुरू केला. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम घाटाची कल्पना गेल्या काही वर्षांपासून मी राबवत आहे. यावर्षी साडेचार हजार लोकांनी याचा लाभ घेतला. याबरोबरच तरुणांसाठी क्रिकेट स्पर्धा, जॉब फेअर, गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार व त्यांना लॅपटॉप मोबाईल आदी साहित्याचे वाटप उपक्रम राबविला जात आहे. नागरी सुविधा केंद्रमार्फत विविध शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी केला आहे.
मात्र आता त्यापेक्षा मोठी झेप घेऊन संपूर्ण मावळ मतदार संघाचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. मावळात पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटनाचा विकास करणे त्या दृष्टीने एकविरा देवी परिसराचे सुशोभीकरण तसेच रायगड जिल्ह्यातील लेणी परिसर सुशोभित करणे एलिफंटा लेणी विकसित करणे, रेल्वेचे चौपदरीकरण तरुणांना रोजगार अशा शाश्वत विकासावर भर द्यावा लागणार आहे. मावळ आणि रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही सोडविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी मला आपणा सर्वांचे आशीर्वाद गरजेचे आहेत. आपण आपला आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर ठेवला म्हणून मी आजवर वाटचाल करू शकलो.
यावेळी सहभागी झालेल्या प्रेक्षकांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये लावणी, गरबा, LED डान्स दिल्ली, झिरो ग्रव्हिटी डान्स ग्रुप मुंबई, बेली डान्स, फायर डान्स आदी चित्तथरारक प्रात्यक्षीकांबरोबर संगीताच्या तालावर सादर झालेल्या नृत्याअविष्काराने अबाल वृद्धांनी ठेका धरला. सायंकाळी ५ वाजल्यापासून परिसरातील नागरिकांनी क्रीडांगणाकडे गर्दी करायला सुरुवात केली. काही कालावधीतच क्रीडांगण गर्दीने भरून गेले होते. कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे, उमेश खंदारे, शेखर अहिरराव, नितीन गव्हाणे, कुणाल सातव, सचिन वाघेरे, विठ्ठल जाधव, गणेश मंजाळ, श्रीकांत वाघेरे यांनी केले.