‘काहीजण अमक्यावर-तमक्याबद्दल सूतोवाच करतात, नंतर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते’
मुंबई: काहीजणांकडून अमक्यावर कारवाई होणार, तमक्यावर कारवाई होणार, असे सूतोवाच केले जाते. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई केली जाते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये. पारदर्शक तपासासाठी कोणाची ना नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर ईडीकडून (ED) करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
केंद्रीय तपास यंत्रणा त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करतात. आपण राज्यातील अनेकांबाबत आयकर, सीबीआय आणि ईडीकडून कारवाया झाल्याचे बघितले आहे. माझ्याही नातेवाईकांवर प्राप्तीकर खात्याने धाडी टाकल्या आहेत. केंद्रीय यंत्रणांना तपासचा अधिकार आहे. पण कुठल्या आधारावर कारवाया होतात, ते पाहिले पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करु नये, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
अनिल परब यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीचे छापे
ईडीने गुरुवारी सकाळी शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकले होते. यामध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश आहे. ईडी (ED) अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले होते. विशेष म्हणजे ईडीने अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Laundering) गुन्हाही दाखल केला आहे. कोणतेही ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय ईडीकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.