…तर मशिद जादूनं पडली का, ओवेसींचा संतप्त सवाल
नवी दिल्ली | बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय बुधवारी उत्तर प्रदेशातील लखनऊमधील विशेष सीबीआय न्यायालयानं दिला. बाबरी मशिद विध्वंस प्रकरणाच्या खटल्यात सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सदर घटना पूर्वनियोजीत नव्हती, असं न्यायाधीश सुरेंद्र यादव यांनी म्हटलं. बाबरी मशिद उद्धस्त केल्यानंतर तब्बल २८ वर्षानंतर लखनऊमध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला.
न्यायालयाच्या याच निकालावर संतप्त प्रतिक्रिया देत एमआयएमचे खासदार asaduddin owaisi अससुद्दीन ओवेसी यांनी काही प्रश्न उपस्थित केले. एका पत्रकार परिदषेच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओवेसी यांनी या निकालाचा निषेध केला.
हा निकाल म्हणजे भारतीय इतिहासातील काळा दिवस, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयानं ९ नोव्हेंबरला जो निर्णय़ दिला होता, त्यात नियमांचं उल्लंघन करत सार्वजनिक धार्मिक स्थळाची संघटीत प्रयत्नांनी नासधूस करण्यात आली होती असं स्पष्ट म्हणण्यात आल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
शिवाय आता सर्वोच्च न्यायालयच असं म्हणत असताना आज त्याविरोधातील निर्णय येणं ही बाब निराशाजनक असल्याचं स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं. मशिद काय जादूनं पडली होती का, असा सवाल त्यांनी केला.