…तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन- दत्तात्रय भरणे
सोलापूर – सोलापूरसाठीच्या नियोजित पाण्यामधील उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी हा आरोप करत त्यांचा निषेध केलाय. या आरोपांवर दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उजनी धरणातील सोलापूर शहर जिल्ह्याचे नियोजित एक थेंब पण पाणी पालकमंत्री म्हणून घेतले असल्याचं सिद्ध केल्यास मी मंत्रीपद नव्हे तर आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे.
उजनीचं पाणी जर इंदापूरसाठी घेतलं असलं तर राजकीय सन्यास घेईन. उजनी धरणाचं 5 टी एम सी पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप केला जातोय, मात्र, माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, असं दत्तात्रय भरणे म्हणाले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे मागच्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे दाखल झाले होते. सोलापूर जिल्ह्याचे 900 रेमडेसिव्हीर इजेंक्शन इंदापूरला पालकमत्र्यंनी नेल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली.