“शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्ही पाळणा हालवणार का?”
सातारा – 18 वर्षावरील सर्वांना मोफत कोरोना लस देण्याच्या मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. शेजाऱ्याला पोरगं झालं की तुम्हा पाळणा हालवणार का?, असा टोला सदाभाऊ खोत यांनी सरकारला लगावला आहे.
राज्य सरकार सगळी मदत केंद्राकडून मागत आहेत. रेमडेसिव्हीर केंद्राककडून, ऑक्सिजन केंद्राने, लस केंद्राने, व्हेंटीलेटर केंद्राने, मग तुम्ही काय करताय. आज एक घोषणा पाहिली की 18 ते 45 वयोगटातल्या सर्वांना मोफत लस देणार. हे तर केंद्राने जाहीर केलं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे बेड उपलब्ध नाहीत,लोकांना ऑक्सिजन मिळत नसल्याने ते तडफडून मरत असताना राज्यसरकार काहीच करत नाहीये. राज्यातील आमदारांनी DPDC च्या माध्यमातून मिळालेले 20 कोटी आपल्या मतदार संघात आणले. तसेच ठेकेदारांकडून कमिशन खाऊन ठेकेदारांना जगवण्याचं काम केलं, असं म्हणत खोत यांनी राज्यातील मंत्र्यांवरसुद्धा गंभीर आरोप केलेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सर्व साखर कारखाने कोरोना हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितलं. ही मात्र एकाही कारखान्याने हॉस्पिटल उभारलं नाही. आता कारखाने ऑक्सिजन पुरवणार असं म्हणतायत. म्हणजे देहूच्या आळंदीला जायचं सोडून चोराच्या आळंदीला पोहचलेल्या लोकांनी सांगायचं पाकीट मारलेले पैसे परत दिले जाणार आहेत. असं कुठं घडू शकतं का, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.