‘२०४७ पर्यंत विकसित भारताचा आराखडा दर्शवणार अर्थसंकल्प’; अमित शाह
Amit Shah : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतरीम अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारत अग्रेसर व्हावा, यासाठी मोदी सरकारने गेल्या १० वर्षात केलेल्या महत्वाच्या कामगिरीवर अर्थसंकल्पात प्रकाश टाकण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. २०४७ पर्यंत विकसित भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प साकारण्यासाठी आराखडा दर्शवणारा अर्थसंकल्प असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज राज्यांना देण्यात येणार आहे. यामुळं पर्यटन क्षेत्राची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. मोदी सरकारने सादर केलेल्या, शेतकऱ्यांसाठी समर्पित असलेल्या विकसित भारत अर्थसंकल्पाने देशातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नव्या संधी आणल्या आहेत. मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प पर्यटन क्षेत्राला नवी उर्जा देईल असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
हेही वाचा – ‘तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आयुष्मान भारत योजनेद्वारे पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत ३० कोटीपेक्षा जास्त लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार पुरवले आहेत. आयुष्मान योजनेशी आशा सेविका, आंगणवाडी सेविका आणि सहाय्यक यांना जोडण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याने या वर्गालाही मोफत उपचाराचा लाभ घेता येईल. याशिवाय गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी ९ ते १४ वयोगटातल्या मुलींच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्याचा महत्वाचा निर्णयही आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
लक्षद्वीप आणि इतर बेटासाठी हवाई दळणवळण सुरु करत त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ‘सूर्योदय योजना’ पंतप्रधानांचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करत असून एक कोटी कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सौर उर्जा प्रणाली बसवून त्याद्वारे वीज निर्मिती शक्य होणार आहे. त्यांना दरमहा ३०० युनिट वीज मोफत मिळणार असून, त्यामुळं त्यांची वर्षाला १५,००० ते १८,००० रुपयांची बचत होणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.