शरद पवारांची इशारा ः महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवणार
मुंबई : महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज, शनिवारी महामोर्चा काढला होता. या महामोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले होते. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना लोकशाही मार्गाने कायमचा धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली अवमानजनक वक्तव्यांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महामार्चा काढला होता. महामोर्चाच्या माध्यमातून राजकीय शक्तिप्रदर्शन केले. ‘संयुक्त महाराष्ट्रासाठी असेच मोठे मोर्चे निघाले होते. महाराष्ट्राच्या सन्मानासाठी ही जनशक्ती एकवटली आहे. कारण सध्या महाराष्ट्राच्या सन्मावर हल्ले होत आहेत, असा आरोप करून, महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
विविध राज्यांमध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. पण राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची टिंगल केली. अशी टिंगल करताना राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. अशा राज्यपालांची हकालपट्टी झाली नाही तर, महाराष्ट्र पेटून उठेल असा इशाराही त्यांनी दिला.
या सरकामध्ये सध्या महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू आहे. शिक्षणासाठी मागितल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीला ‘भीक’ मागितली असे एका मंत्र्याने म्हटले. यासंदर्भात त्यांनी महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांची उदाहरणे दिली. त्यांनी केलेल्या भरीव कार्याचा हा अपमान आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले. एका परिचित धनाढ्य व्यक्तीने मोठी रकमेची देणगी देऊ करत या कॉलेजला आपले नाव देण्याची मागणी केली. पण कर्मवीर भाऊराव पाटीलांनी त्याला नकार दिला होता, असे शरद पवार यांनी अधोरेखित केले.