पुन्हा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रात पावसाची शक्यता
पुणे : कयार महाचक्रीवादळानंतर आता अरबी समुद्रात मालदीव जवळ एक कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी तयार झाले असून, येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, तामिळनाडु, कर्नाटक किनारपट्टी परिसरात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रावर कयार अतितीव्र चक्रीवादळ आता भारतापासून दूर गेले आहे. त्याचवेळी अरबी समुद्रात मालदीव परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. बुधवारी दुपारी ते केरळमधील तिरुअनंतरपुरम पासून २७० किमी दूर होते. गेल्या ६ तासात ते ताशी १३ किमी वेगाने पुढे सरकत आहे.सुदैवाने हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकत आहे. येत्या १२ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे.
यामुळे लक्ष्यद्वीप बेटांवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़ तसेच पुढील ४८ तासात केरळातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे़ ३१ आॅक्टोबरला कर्नाटक किनारपट्टीवरील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ शिरुर घोडनदी १५ मिमी तसेच सांगलीला पाऊस झाला़ बुधवारी दिवसभरात नाशिक ४, परभणी ५, औरंगाबाद ०.४ मिमी पावसाची नोंद झाली होती़ पुण्यात सायंकाळी काही ठिकाणी पाऊस झाला.