‘पंतप्रधान मोदींना याची किंमत चुकवावी लागेल’; शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय तापमान चांगलच तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभांमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार सध्या माढा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, दुर्दैवाने ज्या पद्धतीच्या गोष्टी पंतप्रधान मांडत आहेत. त्या प्रकारचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही. मी पंडित जवाहरलाल नेहरूंची भाषणं ऐकली आहेत. तेव्हा मी कॉलेजला शिकत होतो. त्यानंतर इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींपासून सर्व पंतप्रधानांची भाषणं मी ऐकली. त्यांनी एक पथ्य असं पाळलं की पंतप्रधान कुठल्याही राज्यात गेले, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत अनादरानं कधीही काही बोलले नाहीत. पण हे पहिले पंतप्रधान आहेत की जे एखाद्या राज्यात जातात आणि तिथे जर इतर पक्षाचं नेतृत्व असेल तर त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करतात.
हेही वाचा – गाडीचा अपघात झाल्यास या गोष्टी नक्की करा! कंपनीकडून मिळेल संपूर्ण खर्च
पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान हेच चित्र दिसतंय. माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाहीत. याची किंमत मोदींना चुकवावी लागेल. ज्यावेळी आत्मविश्वास ढळतो, त्यावेळी अशा व्यक्तिगत टीका-टिप्पणी माणूस करायला लागतो. असं कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं. दुर्दैवाने असं करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्याचे परिणाम दिसतील, असं शरद पवार म्हणाले.
मध्य प्रदेशात भाजपाला जिंकून आणा, रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना केली. यावर शरद पवार म्हणाले, मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात का? पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. पण हे राम मंदिरात तुम्हाला दर्शन फुकट वगैरे सांगतायत याचा अर्थ इतक्या पातळीवर राज्यकर्ते उतरलेत, की त्याची चर्चाही न केलेली बरी, असंही शरद पवार म्हणाले.