‘वर्ल्डकपच्या फायनलमधील संघाला..’; राज ठाकरेंचं विधान चर्चेत
मुंबई : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने धडक मारली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला दुसरा सामना आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये खेळवला जाईल. या सामन्यात विजयी होणारा संघ भारताशी फायनलमध्ये दोन हात करेल. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले, विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार आहे. तर आज उपांत्य फेरीतला दुसरा सामना सुरू होणार आहे. त्या दोन संघांपैकी (दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया) जिंकेल तो संघ अंतिम सामन्यात भारताविरोधात खेळेल. मला वाटतंय, बहुदा त्यांच्यापैकी जिंकेल त्या संघाला सांगतील, साहबने बोला हैं हारने को (साहेबांनी पराभूत होण्यास सांगितलं आहे) असंही सांगितलं जाऊ शकतं.
हेही वाचा – ‘पंतप्रधान मोदींना याची किंमत चुकवावी लागेल’; शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल
भारताने यंदाचा विश्वचषक जिंकणं हा आगामी निवडणूक जिंकण्याच्या रणनीतिचा भाग असू शकतो का? असा सवाल विचारला असता राज ठाकरे म्हणाले, नाही, लोकसभेच्या निवडणुका अद्याप खूप लांब आहेत. जनता चांद्रयानच्या बातम्या विसरली. विश्वचषक कसा लक्षात ठेवतील? लोकसभा निवडणुकीपर्यंत लोक विश्वचषक स्पर्धा विसरतील. रोज इतक्या बातम्या आपण पाहतो, आपल्या मोबाईलवर इतक्या बातम्या दिसतात की लोकांना हे सगळं लक्षात ठेवायला वेळ नाही.
तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल, असं अमित शाह यांनी म्हटलं. यावरून राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली? ते लोकांना सांगा ना. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवत आहात? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात तर काय कामं केली ते सांगा.