शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला; म्हणाले..
मुंबई | अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. चार पीठांच्या चार शंकराचार्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरासाठी १० दिवस उपवास करत आहेत. यावरून, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना टोला लगावला आहे.
शरद पवार म्हणाले की, धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अयोध्येतील मंदिर, श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. राम मंदिराचे काम बाजूला राहिले मात्र आता भाजपा आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहोत.
हेही वाचा – आपला बासमती जगात भारी! जगातील सर्वोत्कृष्ट तांदळांच्या यादीत अव्वल
राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? असा सवाल शरद पवारांनी भाजपला केला आहे. मोदी राम मंदिरासाठी १० दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे. सध्याच्या स्थितीत देशातल्या उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, असंही शरद पवार म्हणाले.