शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका; म्हणाले..
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे सरकार असणाऱ्या राज्यांतील १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांचा समावेश आहे, असा सवाल शरद पवार यांनी केला. ते पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळ्याव्यात बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, केंद्रातील सत्ता एका पक्षाच्या हातात आहे. उत्तरेकडील राज्यांचीही सत्ता भाजपाच्या हातात आहे. त्यांची धोरणं सामाजिक ऐक्याला धक्का पोहोचवणारी आहेत. या धोरणांचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जातो. काल लोकसभेचं कामकाज संपलं. पंतप्रधानांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला समजेल की त्यांनी काहीही विधायक सांगितले नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत भाषण केले होते. त्यावेळीही त्यांनी इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचं राहणं यावरच भाष्य केलं. नेहरुंनी लोकशाही रुजवली, लोकशाहीचं शासन दिलं, त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले मोदी यांनी केले. मला समजत नाही की त्याने काय साध्य होणार आहे. ज्यांनी देशाला दिशा दिली, देशासाठी कष्ट केले त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करणे हे शहाणपणाचं लक्षण नाही.
हेही वाचा – ‘अयोध्या पाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल’; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आज भाजपाच्या विचाराच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जाते. अगोदर लोकांना ईडी हा शब्द माहीत नव्हता. आता ईडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. मी येताना माहिती घेतली की, ईडीचा गैरवापर फार झाला. २००५ ते २०२३ या १८ वर्षांच्या कालावधीत ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली. चौकशी केल्यानंतर सत्यावर आधारित फक्त २५ खटले निघले. त्या २५ खटल्यांपैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. हे करत असताना ईडी कोणाच्या मागे लागली. गेल्या १८ वर्षांत १४७ नेत्यांची चौकशी झाली. त्यात ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षाचे होते, असं शरद पवार म्हणाले.
भाजपा सत्तेत आल्यानंतर आठ वर्षांत १२१ नेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये असलेले १४ मंत्री, २४ खासदार, २१ आमदार, ७ माजी खासदार यांच्यावर कारवाई करण्यात आली,” अशी आकडेवारी शरद पवार यांनी सादर केली. तसेच यामध्ये एकाही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचे नाव नाही. भाजपाच्या नेत्यांविरोधातील चौकशी थांबवण्यात आली. याचा अर्थ काय काढायचा? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.