‘अयोध्या पाठोपाठ लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदिर निर्माण होईल’; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
पुणे | आळंदीमध्ये गीत-भक्ति अमृत महोत्सव कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. अयोध्या, काशी आणि मथुरा ही पवित्र ठिकाणे आहेत. ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला, त्याचप्रमाणे कायदेशीररीत्या मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर देखील निर्माण होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आयोध्या काशी आणि मथुरा ही ठिकाणे अत्यंत पवित्र आहेत. ज्या पद्धतीने राम जन्मभूमी निर्माण झाली, त्या पद्धतीने मथुरा येथे कृष्ण मंदिर निर्माण व्हावे ही लोकांची अपेक्षा आहे. मला विश्वास आहे, ज्या पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत राम मंदिर निर्माण झाले. त्याच पद्धतीने श्रीकृष्ण मंदिर सौहार्दपूर्ण वातावरणात निर्माण होईल.
हेही वाचा – ‘छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी घडवलं’; योगी आदित्यनाथांचं विधान चर्चेत
आचार्य प्रमोद कृष्णम यांना काँग्रेसने निलंबित केल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. त्यांचा दोष येवढाच आहे की त्यांनी काँग्रेसला सांगितले की राम आणि राम मंदिराला विरोध करू नका. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.