breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला’; शरद पवारांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या या निर्णयाला शरद पवारांनी विरोध केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. ते काँग्रेसविरोधी होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल होतं. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला आहे’. हे सांगताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याबरोबर जलसिंचनातील घोटाळ्याची जी तक्रार होती, त्याचा उल्लेख त्यांनी केला. मला आनंद आहे की आज मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा अर्थ, त्याबाबतचे त्यांनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल त्यांनी आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्या्ंनी मुक्त केलं. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे.

आमच्या काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका. ६ तारखेला मी महाराष्ट्राच्या पक्षाच्या काही प्रमुख लोकांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते. संघटनात्मक धोरण करण्याबाबतचे, त्याचा विचार होणार होता. पण त्याआधीच काही सहकाऱ्यांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. आम्हीच पक्ष आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. माझं स्पष्ट मत असं आहे की पक्षाच्या विधिमंडळाच्या सदस्यांनी किती वेगळी भूमिका घेतली, याचं नेमकं चित्र दोन दिवसांत लोकांसमोर येईल. कारण ज्यांची नावं आली, त्यायतल्या काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधून आम्हाला इथे निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका कायम आहे याचा खुलासा त्यांनी माझ्याकडे केला आहे. पण मी यावर आत्ताच काही बोलू इच्छित नाही, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा – ‘राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सरकारमध्ये सहभागी’; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार पुढे म्हणाले की, हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल, मला हा नवीन नाही. १९८० साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो, त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. महिन्याभरानंतर त्यापैकी ६ सोडले तर सगळे माझा पक्ष सोडून गेले. मी त्या ५८ आमदारांचा पक्षनेता होतो, त्याऐवजी मी पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन पुन्हा पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत २ गोष्टी झाल्या. आमची संख्या ६९ वर गेली. संख्या नुसतीच वाढली नाही, तर पक्ष सोडून गेलेल्यांपैकी ३ ते ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. त्यामुळे १९८० चं चित्र पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठिंब्यावर पुन्हा कसं उभं करता येईल, हा माझा एककलमी कार्यक्रम असेल. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर तरुणांवर विश्वास आहे.

कुणी काहीही दावा करावा, माझं काहीही म्हणणं नाही. माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांकडे जाईन. यावर लोक निर्णय घेतील. राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता. आमचे काही मतभेद काँग्रेसशी झाले आणि पक्ष नसताना आम्ही पक्ष स्थापन केला. पहिला पक्ष इतरांनी नेला असेल, पण त्याचा परिणाम आमच्यावर झाला नाही. त्यामुळे कुणी काहीही दावा केला, तरी आम्ही आमची भूमिका लोकांसमोर मांडू. माझी खात्री आहे की आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल, असं शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता ही माहिती मला तुमच्याकडून मिळाली. राजीनामा द्यायचा असेल तर ते द्यायचं ठिकाणी विधानसभा अध्यक्ष हे आहे. विरोधी पक्षनेत्याची नेमणूक अध्यक्ष करतात. त्यांच्याकडे राजीनामा दिला असेल, तर ते आम्हाला कळण्याचं काही कारण नाही. पक्षाचं नाव घेऊन कुणी भूमिका घेत असेल तर त्यावर आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊ. लोकांकडे आमची भूमिका मांडू, असंही शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button