“हा एक कट होता”; सत्यजीत तांबेंचा प्रदेश काँग्रेसवर गंभीर आरोप
बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा कट करण्यात आला
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रदेश काँग्रेसने मला चुकीचे एबी फॉर्म दिले. तसेच कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केला आहे.
मला दोन चुकिचे एबी फॉर्म देण्यात आले. आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी एक षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी स्क्रीप्ट तयार करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून माझ्या माणसाला बोलवून बंद पाकिटात फॉर्म देण्यात आले. ते फॉर्म चुकीचे निघाले. नंतरही आम्हाला चुकीचा फॉर्म देण्यात आला. ते म्हणतात की मुलाने उभे राहायचे की वडिलांनी हा निर्णय तांबे परिवाराला घ्यायचा होता. मग माझ्या वडिलांची उमेदवारी दिल्लीतून का जाहीर करण्यात आली. महाराषट्रातील एकाही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नाही. एकाच उमेदवाराचे नाव दिल्लीतून का जाहीर झाले. हा एक कट होता. बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा कट करण्यात आला, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
माझे दिल्लीमधील काँग्रेसशी बोलणे सुरू होते. माझी चूक नसताना मी माफी मागायला तयार होतो. तसे मी पत्रही पाठवले होते. मात्र मी पत्र पाठवल्यानंतर दोन तासांत महाविकास आघाडीने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला. एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात. ते प्रेमाने लोक जोडा म्हणतात. मात्र राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सर्व प्रकार केला. माझ्या पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी यापुढे या विषयावर परत बोलणार नाही, असंही सत्यजीत तांबे म्हणाले.
दरम्यान, आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसला पाठिंबा देणार की भाजपला असा प्रश्न विचारला असता, मी अपक्ष निवडणूक लढलो आणि यापुढेही मी अपक्षच राहणार, असं म्हटलं आहे.