बच्चू कडूं स्वत:ही प्रवेश करतायत का? संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया
स्थानिक भाजपा नेते फार कमकुवत आणि दुबळे आहेत
मुंबई : राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, बच्चू कडू यांच्या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
बच्चू कडू स्वत:ही प्रवेश करतायत का? कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहितीये की भाजपाचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडूंची माहिती बरोबर आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
मोदींच्या मुंबई दौऱ्याविषयी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान वारंवार मुंबईत येतायत, कर्नाटकमध्ये जातायत. जिथे निवडणुका आहेत, तिथे पंतप्रधान वारंवार जातात. याचा अर्थ स्थानिक भाजपा नेते फार कमकुवत आणि दुबळे आहेत. पंतप्रधान स्वत: पालिका जिंकू इच्छितात, असंही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, इतर पक्षातले आमदार आहेत, त्यांचाही पक्षप्रवेश होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याचं कारण कोर्ट आणि पक्षप्रवेश आहे. 10 ते 15 आमदार पक्ष सोडणार आहेत. पक्ष कोणता हे सांगणार नाही. ठाकरे गटात आमदारच नाही राहिले, बाकीच्या पक्षातले आहेत. अधिवेशनाच्या आधी या आमदारांचा पक्ष प्रवेश होईल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.