हा जुना भारत नाही हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकले आहे – पंतप्रधान
भारताने पाकिस्तानातील बालकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे मागणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार स्ट्राइक केला आहे. यापूर्वी सुद्धा झालेले हल्ले आणि बॉम्बस्फोटाचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले होते. पण आधीच्या सरकारने काय केले ? त्यांनी फक्त गृहमंत्री बदलला. तुम्ही मला सांगा अशा परिस्थितीत गृहमंत्री बदलायचा की, धोरण? असा सवाल मोदींनी केला. ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील सभेत बोलत होते.
मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर सैन्य दल बदला घेण्यासाठी तयार होते. पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही. २०१६ साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सरकारने झोपून राहावे असे तुम्हाला वाटते का? चौकीदार झोपत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला धक्का दिला.
एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान रडत होता. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने तयारी केली होती. उरी सारखा सर्जिकल स्ट्राइक होईल असे त्यांना वाटले होते. पण आपण हवाई हल्ला केला. भारत सर्जिकल स्ट्राइक सारखे काही तरी करेल असे पाकिस्तानला वाटले. त्यांनी सीमेवर सुरक्षा वाढवली. सैनिक, रणगाडे तैनात केले. पण आपण हवाई मार्गाने गेलो आणि हल्ला चढवला. पाकिस्तानची झोप उडवून दिली. या कारवाईने पाकिस्तान इतका घाबरला की, सकाळी पाच वाजल्यापासून त्यांनी टि्वट करायला सुरुवात केली. पाकिस्तानातून सर्व बातम्या आल्या असे मोदी यांनी सांगितले.
आधीच्या सरकारच्या धोरणांमुळे दहशतवादाचे संकट अधिक गंभीर बनल्याचा आरोप मोदींनी केला. सर्जिकल आणि एअर स्ट्राइकनंतर आता हा जुना भारत राहिलेला नाही हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकले आहे असे मोदी म्हणाले. देशाचे वीर जवान आपली जबाबदारी निभावत आहेत. देशाचे नागरीक म्हणून आपल्यालाही सर्तक राहून आपली जबाबदारी निभावायची आहे. २०१४ पासून आम्ही मजबूत, सशक्त भारत बनवण्यासाठी काम करत आहोत असे मोदींनी सांगितले.